यहूदीया येथून काही माणसे अंत्युखियास आली व विश्वासणार्यांना शिकवू लागली: “मोशेने शिकविलेल्या नियमशास्त्राप्रमाणे जोपर्यंत तुमची सुंता होत नाही, तोपर्यंत तुमचे तारण होणे शक्य नाही.”
EN
Copywork
Marathi OMRCV Acts 15장
Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
Practice by section · Acts
पौल आणि बर्णबाचा त्यांच्याबरोबर प्रखर मतभेद व वादविवाद झाला. शेवटी पौल आणि बर्णबाबरोबर इतर काही विश्वासणार्यांची नेमणूक करण्यात आली व या प्रश्नांसंबंधी यरुशलेम येथे प्रेषित व वडीलजनांना भेटावे म्हणून त्यांना पाठविण्यात आले.
नंतर मंडळीने त्यांना निरोप देऊन पाठविले आणि जसे ते फेनिके आणि शोमरोनामधून प्रवास करीत गेले, गैरयहूदीयांचे कसे परिवर्तन झाले हे त्यांनी तेथील लोकांना सांगितले. या बातमीने सर्व विश्वासणार्यांना अतिशय आनंदित केले.
जेव्हा ते यरुशलेममध्ये आले, तेथील मंडळी, प्रेषित व वडीलजनांनी त्यांचे स्वागत केले आणि परमेश्वराने जे सर्वकाही त्यांच्या सेवेद्वारे केले होते, याची सविस्तर माहिती पौल व बर्णबाने त्यांना दिली.
परूशी लोकांच्या पंथातील काही विश्वासू सभासद उठून उभे राहिले व म्हणाले, “गैरयहूदी लोकांची सुंता झालीच पाहिजे व मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणे त्यांना आवश्यक आहे.”
प्रेषित आणि पुढारी या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी एकत्रित भेटले.
बरीच चर्चा झाल्यानंतर, पेत्र उभा राहिला व त्यांना उद्देशून म्हणाला: “बंधूंनो, हे आपणा सर्वांस माहीत आहे की गैरयहूदीयांनी विश्वास ठेवावा व माझ्याद्वारे शुभवार्तेचा संदेश त्यांना कळावा यासाठी फार काळापूर्वी परमेश्वराने माझी निवड केली होती.
परमेश्वर अंतःकरणे ओळखतो, त्यांनी आपल्याप्रमाणेच गैरयहूदी लोकांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांचाही स्वीकार केला आहे, असे स्पष्ट दाखविले आहे.
त्याने त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कसलाही भेदभाव केलेला नाही, कारण त्याने त्यांची मने विश्वासाद्वारे शुद्ध केली आहेत.
तेव्हा आता, जे जू आपल्याला व आपल्या पूर्वजांना वाहवयास अशक्य होते, ते गैरयहूद्यांना वाहवयास लावून तुम्ही जणू परमेश्वराची परीक्षा पाहता काय?
नाही! आमचा विश्वास आहे की प्रभू येशूंच्या कृपेद्वारे आपल्याप्रमाणे त्यांनाही तारण मिळाले आहे.”
तेव्हा बर्णबा व पौल यांच्याद्वारे गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराने जी चिन्हे व अद्भुते केली यांचे वर्णन ऐकत असताना सर्व सभा स्तब्ध राहिली.
मग त्यांचे बोलणे आटोपल्यावर याकोब म्हणाला, “बंधूंनो, माझे ऐका.
परमेश्वराने प्रथम मध्यस्थी करून गैरयहूदी लोकांमधून आपल्या नावासाठी लोक निवडून घेतले हे शिमोनाने वर्णन करून आपल्याला सांगितले आहे.
संदेष्ट्यांचे शब्द याच्याशी सहमत आहे, असे लिहिले आहे:
“ ‘यानंतर मी पुन्हा येईन
म्हणजे उरलेली मानवजात प्रभूचा शोध करेल,
प्रारंभीच्या काळापासून या गोष्टी प्रकट करणारे परमेश्वर असे म्हणतात.
“माझा न्याय असा आहे की, जे गैरयहूदी परमेश्वराकडे वळत आहेत, त्यांच्यासाठी कठीण होईल असे आपण करू नये.
फक्त त्यांना एवढेच लिहून कळवावे की, त्यांनी मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून आणि गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि रक्ताचे सेवन करण्यापासून स्वतःला दूर ठेवावे.
कारण प्राचीन काळापासून मोशेच्या नियमशास्त्राचा प्रत्येक शहरामध्ये प्रचार केला जाऊ लागला आणि प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये त्याचे वाचन होऊ लागले.”
मग प्रेषित आणि वडीलजन व सर्व मंडळीने ठरविले की त्यांची काही निवडलेली माणसे अंत्युखियास पौल व बर्णबा यांच्याबरोबर पाठवावीत. त्यांनी यहूदाह ज्याला बारसब्बास असेही म्हणत असत व सीला यांना निवडले. हे दोघे विश्वासणार्यामधील पुढारी होते.
त्यांनी आपल्याबरोबर नेलेल्या पत्राचा मजकूर असा होता:
आमच्यामधून काहीजण आमच्या परवानगीशिवाय तिथे येऊन तुम्हाला गोंधळात पाडत आहेत आणि त्यांच्या बोलण्याने तुमची मने विचलित करीत आहेत असे आमच्या ऐकण्यात आले आहे.
तेव्हा आम्ही सर्वांनी ठरविले की आमचे प्रिय बंधू बर्णबा व पौल यांच्याबरोबर काही जणांना निवडून तुमच्याकडे पाठवावे.
या लोकांनी आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी आपले जीव धोक्यात घातले होते.
यास्तव यहूदाह व सीला यांना पाठविले असून ते स्वतः आम्ही लिहिलेल्या या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील.
पवित्र आत्म्याला आणि आम्हाला हेच योग्य वाटले की, ज्या आवश्यक गोष्टींशिवाय तुमच्यावर ओझे टाकले जाऊ नये त्या अशा आहेत:
मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्ताचे सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवावे. या गोष्टी टाळण्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर ते तुमच्या हिताचे होईल.
ती माणसे तिथून खाली अंत्युखियात आली आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी सर्व मंडळीला एकत्र जमवून ते पत्र त्यांच्याकडे सोपविले.
लोकांनी ते वाचले आणि त्यातील उत्तेजनपर संदेशाने ते आनंदित झाले.
मग यहूदाह आणि सीला, जे स्वतः संदेष्टे होते, त्यांनी विश्वासणार्यांना पुष्कळ गोष्टी बोलण्याद्वारे उत्तेजित करून स्थिरावले.
तिथे काही काळ राहिल्यानंतर, तेथील विश्वासणार्यांनी त्यांना शांतीचा आशीर्वाद देऊन, ज्यांनी त्यांना पाठविले होते त्यांच्याकडे परत पाठविले.
परंतु सीला तिथेच राहिला.
पौल व बर्णबा अंत्युखियामध्ये राहिले, तिथे ते व त्यांच्याबरोबर अनेकांनी शिक्षण दिले आणि प्रभूच्या वचनाची घोषणा केली.
काही काळानंतर पौलाने बर्णबाला म्हटले, “आपण परत जावे व ज्या ज्या सर्व शहरांत जिथे आपण प्रभूच्या वचनाचा प्रचार केला होता, तेथील विश्वासणार्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करावी.”
बर्णबाला हवे होते की योहान, ज्याला मार्क असेही म्हणत, त्यालाही आपल्याबरोबर न्यावे.
परंतु पौलाला त्याला बरोबर नेणे सुज्ञपणाचे वाटले नाही, कारण मार्क त्यांना पंफुल्यामध्ये सोडून गेला होता आणि या कार्यात पुढे जाण्यासाठी त्याने साथ दिली नव्हती.
याबाबत त्यांचा मतभेद एवढा तीव्र झाला की त्यांनी एकमेकांची सोबत सोडली. बर्णबाने आपल्याबरोबर मार्कला घेतले आणि जहाजात बसून ते सायप्रसला गेले,
परंतु पौलाने सीलाची निवड केली व त्यासह तो निघाला. विश्वासणार्यांनी त्यांना शाबासकी देऊन प्रभूच्या कृपेवर सोपविले.
तो सिरिया व किलिकियामधून मंडळ्यांना बळकट करीत गेला.