आता हनन्याह नावाचा मनुष्य आणि त्याची पत्नी सप्पीरा या दोघांनी मिळून आपल्या संपत्तीचा एक भाग विकला.
EN
Copywork
Marathi OMRCV Acts 5장
Copywork is not a speed-typing drill but time to re-hold the words and flow of Scripture, one verse at a time. Your input is saved temporarily in this browser, and to your account when you are signed in.
Practice by section · Acts
मिळालेल्या पैशातून काही पैसे त्याने त्याच्या पत्नीच्या पूर्ण संमतीने स्वतःसाठी ठेवले व बाकीचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणी ठेवले.
परंतु पेत्र म्हणाला, “हनन्याह, सैतानाने तुझे हृदय एवढे कसे भरले की तू पवित्र आत्म्याशी लबाडी केलीस व मालमत्ता विकून आलेल्या पैशातून काही पैसे तुझ्या स्वतःसाठी ठेवून घेतलेस?
संपत्ती विकण्यापूर्वी ती तुझ्या मालकीची नव्हती का आणि ती विकल्यानंतर, त्या पैशाचा वापर कसा करावा हे देखील तुझ्या अधिकारात नव्हते का? तर मग असे करण्याचे तुझ्या मनात कसे आले? तू केवळ मनुष्याबरोबर नाही तर परमेश्वराबरोबर लबाडी केली आहेस.”
हे शब्द ऐकताच हनन्याह खाली कोसळला आणि मरण पावला. घडलेल्या गोष्टी ऐकून सर्वजण भयभीत झाले.
नंतर काही तरुण पुरुष पुढे आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह गुंडाळला व बाहेर नेऊन पुरून टाकला.
सुमारे तीन तासानंतर त्याची पत्नी आत आली, काय घडले होते याची तिला कल्पना नव्हती.
पेत्राने तिला विचारले, मला सांग “तुला व हनन्याला जमिनीची इतकीच किंमत मिळाली काय?”
मग पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही कट का केला? ऐक, ज्या पुरुषांनी तुझ्या पतीला नुकतेच पुरले आहे त्यांचे पाय दारातच आहेत आणि ते तुलादेखील उचलून बाहेर नेतील.”
त्याच क्षणी ती त्याच्या पायावर कोसळली आणि मरण पावली आणि ते तरुण आत आले व तिचा मृत्यू झाल्याचे पाहून तिला बाहेर नेऊन तिच्या नवर्याजवळ पुरले.
सर्व मंडळी आणि ज्या सर्वांनी हे ऐकले ते सारे भयभीत झाले.
प्रेषित लोकांमध्ये अनेक चिन्हे व अद्भुत कृत्ये करीत होते आणि सर्व विश्वासणारे एकत्रितपणे शलोमोनाच्या देवडीत जमत असत,
त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात अत्यंत सन्मान होता, परंतु त्यांच्यात सामील होण्याचे धैर्य कोणाला झाले नाही.
तरी देखील अधिकाधिक पुरुषांनी व स्त्रियांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या संख्येत वाढ झाली.
याचा परिणाम असा झाला की, पेत्र जवळून जात असताना निदान त्याची छाया तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी म्हणून आजारी लोकांना बाहेर रस्त्यावर आणून खाटांवर आणि अंथरुणावर ठेवीत असत.
यरुशलेमच्या आसपासच्या गावातून लोकसमुदाय येताना त्यांच्याबरोबर आजारी व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना आणत होते आणि ते सर्वजण बरे होऊन जात.
नंतर महायाजक आणि त्यांचे सहकारी जे सर्व सदूकी पंथाचे सभासद होते, ते मत्सराने भरून गेले.
त्यांनी प्रेषितांना अटक करून सार्वजनिक तुरुंगात डांबले.
परंतु रात्रीच्या समयी प्रभूच्या देवदूताने तुरुंगाचे दरवाजे उघडून त्यांना बाहेर काढले.
तो म्हणाला, “मंदिराच्या आवारात जा आणि या नवजीवनाबद्दल लोकांना सांगा.”
ते पहाटेच मंदिराच्या आवारात गेले आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे लगेच त्यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली.
तुरुंगामध्ये गेल्यानंतर, अधिकार्यांना तिथे प्रेषित आढळले नाहीत म्हणून ते परतले आणि त्यांना सांगितले की,
“तुरुंगाचे दरवाजे व्यवस्थित बंद केलेले होते आणि पहारेकरी दाराबाहेर उभे होते. परंतु आम्ही दरवाजे उघडले, तेव्हा आम्हाला कोणीही आढळले नाही.”
मंदिराच्या सुरक्षा अधिकार्याने व मुख्य याजकांनी हे ऐकले, तेव्हा पुढे काय घडेल याबद्दल ते घोटाळ्यात पडले.
इतक्यात कोणीतरी येऊन सांगितले, “पाहा! ज्यांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ती माणसे मंदिराच्या आवारात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.”
तेव्हा सुरक्षा अधिकारी आपल्याबरोबर काही शिपाई घेऊन गेला आणि त्याने प्रेषितांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपल्याला धोंडमार करतील, अशी त्यांना भीती वाटत होती.
प्रेषितांना घेऊन आल्यानंतर, महायाजकाने त्यांना प्रश्न विचारावे म्हणून न्यायसभेपुढे आणून उभे केले.
ते म्हणाले, “या नावाने शिकवू नका, असे आम्ही तुम्हाला कडक शब्दात सांगितले होते तरी पाहा, तुम्ही तुमच्या शिक्षणाने सारे यरुशलेम भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्ताचा दोष आम्हावर लावण्याचा निश्चय केला आहे.”
परंतु पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळलीच पाहिजे.
तुम्ही येशूंना क्रूसावर टांगून मारल्यानंतर आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने येशूंना मरणातून पुन्हा जिवंत केले.
आता परमेश्वराने त्यांना उच्च केले व राजपुत्र आणि तारणारा म्हणून स्वतःच्या उजवीकडे बसविले आहे, ते यासाठी की इस्राएली लोकांना पश्चात्ताप व पापक्षमेचा लाभ व्हावा.
या गोष्टींचे आम्ही साक्षी आहोत आणि पवित्र आत्मा, ज्याला परमेश्वराने जे त्यांची आज्ञा पाळतात त्यांना दिला आहे तोही साक्षी आहे.”
हे ऐकल्यावर ते अतिशय संतापले व त्यांना मारून टाकण्याचे त्यांनी ठरविले.
परंतु गमालियेल नावाचा एक परूशी, जो शास्त्राध्यापक व सर्व लोकांमध्ये सन्मान्य मानलेला, न्यायसभेपुढे उभा राहिला आणि त्याने या माणसांना थोडा वेळ बाहेर न्यावे, अशी आज्ञा केली.
मग तो न्यायसभेला उद्देशून म्हणाला, “अहो इस्राएली लोकहो, या मनुष्यांच्या बाबतीत काही करण्याच्या तुमच्या उद्देशाचा काळजीपूर्वक विचार करा.
काही काळापूर्वी थुदास नावाचा मनुष्य पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला, त्याला सुमारे चारशे अनुयायी मिळाले. त्याचा वध करण्यात येऊन सर्व अनुयायांची पांगापांग झाली व सर्वकाही नष्ट झाले.
त्याच्यानंतर शिरगणतीच्या वेळी, गालीलकर यहूदाह पुढे आला आणि त्याने एका टोळीस बंडास प्रवृत्त केले. परंतु तो सुद्धा मारला गेला आणि त्याच्या अनुयायांचीही पांगापांग झाली.
म्हणून मी तुम्हाला या सद्य परिस्थितीत असा सल्ला देत आहे की या माणसांना सोडून द्या. त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा कार्य मनुष्यांचे असेल, तर ते नष्ट होईल.
परंतु जर हे परमेश्वराचे असेल, तर तुम्ही या माणसांना थांबविण्यास समर्थ होणार नाही आणि तुम्ही केवळ परमेश्वराविरुद्ध लढत आहात, असे तुम्हाला आढळून येईल.”
त्याच्या भाषणामुळे त्यांचे मन वळाले; त्यांनी प्रेषितांना आत बोलावून फटके मारविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा कधीही बोलू नका, अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले.
प्रेषित तर न्यायसभेतून आनंद करीत बाहेर पडले. कारण येशूंच्या नावाकरिता अप्रतिष्ठा सहन करण्यासाठी ते पात्र ठरविले गेले होते.
आणि प्रत्येक दिवशी मंदिराच्या आवारात व घरोघरी जाऊन “येशू हेच ख्रिस्त आहेत” याबद्दलचे शिक्षण देण्याचे व शुभवार्तेची घोषणा करण्याचे त्यांनी थांबविले नाही.